Saturday, 18 October 2025

🌈 बाप....

*🌹'बाप'🌹*
     आजवर बऱ्याच जणांनी आईचं महत्व सांगितलं आहे. आई म्हणजे 'आत्मा आणि ईश्वर' या दोहोंचं एक रूप आहे. आई आपल्याला जीवन देते. आईमुळं आपणाला जग पाहण्याची संधी मिळते. खरंच आई पृथ्वी एवढी महान आहे. म्हणूनच आईला पृथ्वीची उपमा दिली आहे. आतापर्यंत या जगात कित्येक तत्त्ववेत्ते झाले. पण आजवर बाप मात्र दुर्लक्षिला गेला आहे. आई पृथ्वीप्रमाणे महान असेल तर बाप आकाशाएवढा उंच आहे. आईचं हृदय सागरासारखं विशाल असेल तर बापाचं मन आकाशाएवढं प्रचंड मोठं आहे. आईमुळं आपल्याला जेवण मिळत असेल तर बापामुळं आपल्याला जीवन मिळतं. बापामुळं आपल्याला नाव मिळतं, गाव मिळतं, आयुष्याची ओळख मिळते. जोपर्यंत बाप आहे तोवर कसलाही त्रास अन् ताप नसतो. ज्याचा बाप जिवंत आहे त्याच्या घराकडं वाईट नजरेनं बघायची कुणाचीही हिंमत होत नाही. कारण बाप म्हणजे भक्कम भिंत असलेल्या तटबंदीचा बुलंद दरवाजा असतो. बाप म्हणजे आपल्या जीवनाचं सुरक्षित असं कवच असतं. बाप म्हणजे जगण्यासाठी आधार देणारा 'आधारवड' असतो, अखंड मायेचा निर्झर असतो. तो सर्वस्व अर्पण करून कुटुंबाचं पालन करीत असतो. तो आपल्या मुलांचा 'पालनकर्ता' असतो.
    बापाचं जगणं हे स्वतःसाठी कधीच नसतं. तो प्राण पणाला लावून घरातील प्रत्येकासाठी जगत असतो. तो अर्धपोटी राहून उन्हातान्हात राबून घाम गाळत असतो, आपल्या मुलां-बाळांच्या भविष्यासाठी सतत झटत असतो. तो स्वतःच्या इच्छा-आकांक्षाकडे दुर्लक्ष करून अट्टाहासाने कुटुंबाच्या गरजा पूर्ण करीत असतो. तो आपल्या मुलांच्या काळजीनं आतून झुरत असतो. बाप कुटुंबाच्या सौख्य, समाधानासाठी स्वतःच्या सुखाला मुरड घालत असतो. त्याच्यामुळं आपल्या घराला घरपण मिळत असतं. तो कितीही अडचणीत असला तरी कुटुंबाच्या परमसुखासाठी कायम आसुसलेला असतो. आकार अन् आधार देऊन मुलांचं आयुष्य घडवण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. कष्टाची जाण आणि प्रामाणिकपणा या गोष्टी सांगून अन् शिकवून कधीच कुणाला अवगत होत नसतात. तर सद्गुण हे बापाच्या संस्कारातूनच मुलाच्या अंगी उतरले जातात. बापानं मुलांच्या भवितव्यासाठी फार मोठा त्याग केलेला असतो.
     मोठ्या कष्टानं तो मुलीचं शिक्षण करतो. तिला स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर भक्कम उभा करतो. तिचे उज्वल कर्तृत्व पाहून तो मनोमनी आनंदीत होतो. पण परक्याचं धन म्हणून मुलीला सासरी पाठवण्याची धडपड मात्र बापाला नेहमी अस्वस्थ करत असते. एकेदिवशी आपलं घर सोडून ती जाणार याची त्याला फार खंत लागून राहते. मुलीचं भावी आयुष्य सुखा-समाधानानं जावं यासाठी अनुरूप स्थळ पाहून, हवं ते देऊन लग्न लावून दिलं जातं. अक्षता पडल्यावर मुलगी सासरी जाताना झाडासारखं खंबीर मन असणारा बाप पुरता खचून जात असतो. आपली पोरगी आपल्यापासून दूर जात आहे म्हणून बाप व्यथित होतो. अगतिक झालेल्या बापाच्या अश्रूंचा बांध फुटतो. मग तो तोंड लपवून त्या लग्नमंडपाच्या कोपऱ्यातल्या खांबाला धरून एकटाच हमसून-हमसून रडत असतो. रडतेवेळी डोळ्यातलं पाणी मात्र तो कुणाला दाखवत नसतो. बापाच्या हृदयात एक नाजूक असा हळवा कोपरा असतो. त्यानं हृदयाच्या हळव्या कोपऱ्यात मुलीच्या लहानपणच्या कोमल आठवणी जपून ठेवलेल्या असतात. त्या आठवणी तिच्या उज्वल भविष्याचा वेध घेत असतात. बाप आपल्या मुलीचा हात तिला आधार देण्यासाठी थोड्या काळासाठी धरत असतो. पण तो मुलीच्या हृदयाला मात्र आपल्या काळजाच्या घरात कायमचं जपून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. आजवर त्यानं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला काळजाचा तुकडा नाईलाजास्तव तो परक्याच्या स्वाधीन करतो. त्याक्षणी मात्र त्याची अगतिकता आणि मनाची घालमेल पाहून साऱ्यांचं मन कसं हेलावून जातं.. हेलावून जातं..  
     आपल्या भारत देशात मुलांसाठी त्याग करणारे विशाल हृदयाचे चार कर्तृत्ववान बाप होऊन गेले. त्या चौघांनी या जगातील पुढील कित्येक पिढ्यांसाठी महान असा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. 
१. सूर्यवंशी कुळातील राजा दशरथ :- दशरथ राजाचा ज्येष्ठ पुत्र प्रभू रामचंद्र यांनी सावत्र आईची आज्ञा प्रमाण मानून वनवास पत्करला. त्यावेळी पिता म्हणून राजाचा नाईलाज झाला. राजाचे श्रीरामावर अतिशय प्रेम होते. लाडक्या मुलावर वनवासाला जाण्याची वाईट वेळ आली, मुलगा आपल्यापासून दुरावला. याचे राजाला अतीव दुःख झाले. पुत्रवियोगाने दशरथ राजाने अन्न-पाणी वर्ज्य करून प्राणत्याग केला. चौदा वर्षांनंतर प्रभू रामचंद्रांनी भूतलावर सामान्य जनतेसाठी आदर्शवत असं रामराज्य निर्माण केलं.
२. यादव कुळातील राजपिता वसुदेव :- वसुदेव आणि देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. कर्दनकाळ असणारा कंसमामा बाळकृष्णाला जीवे मारणार याची पिता वसुदेवाला फार भीती होती. दुष्ट कंसाच्या तावडीतून बाळाची सुखरूप सुटका करणं भाग होतं. समोर यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. मरण आ वासून उभं ठाकलं होतं. मृत्यूची तमा न बाळगता रात्रीच बाळाला टोपलीत घालून यमुना नदी ओलांडली. आपल्या बाळाला सुखरूपणे यशोदामातेकडे सुपूर्द केले. तोच बाळकृष्ण द्वारकेचा राजा झाला अन् जगाला गीतेतून महान उपदेश केला.
३. स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले :- मोगलांकडून सामान्य जनतेचा अनन्वित छळ, अत्याचार चालू होता. हे शहाजीराजांना कदापि पाहवलं नाही. म्हणून त्यांनी रयतेचं हित जोपासण्यासाठी 'स्वराज्य' स्थापन करण्याचा महान संकल्प सोडला. त्या संकल्पपूर्तीसाठी त्यांनी आयुष्यभर कधी निजामाच्या तर कधी आदिलशहाच्या दरबारी सरदारकी गाजवली. इकडे स्वराज्यजननी जिजाऊसाहेबांनी शिवरायांना संस्काराचे धडे दिले. पित्याच्या कर्तृत्वाच्या आणि आशीर्वादाच्या पाठबळातून छत्रपती शिवरायांनी रयतेचं 'स्वराज्य' स्थापन केलं. त्यांनी रयतेचा आदर्श राजा म्हणून साऱ्या जगात नावलौकिक मिळविला.
४. स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजीराजे :- शिवपुत्र शंभूराजे हे स्वराज्याचे वारस आहेत. आपल्यामागे शंभूराजांनी यथोचितपणे स्वराज्याचं रक्षण करून ते वाढवलं पाहिजे. महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून सुटका करून घेतल्यावर औरंगजेबाचे सैन्य त्यांना पकडण्यासाठी पाठलाग करत होतं. स्वराज्याचा वारस सुरक्षितपणे स्वराज्यात परत यावा यासाठी शिवरायांनी मन घट्ट करून शंभूबाळाचं जिवंतपणी पिंडदान केले. शिवपुत्र शंभूराजांनी पित्यानंतर प्राणाचं बलिदान देऊन रयतेच्या स्वराज्याचं रक्षण केलं.
    लेकरांसाठी कितीही कष्ट, यातना सोसायला अन् त्याग करायला तत्पर असतो, तो आपला बाप असतो. ज्या मुलांनी बापाचं कष्ट, तगमग डोळ्यांनी पाहिलेली असते. जी मुलं बापाच्या आज्ञेत अन् संस्कारात वाढलेली असतात. अशा मुलांना बापाच्या त्यागाची व कष्टाची पुरेपूर जाणीव असते. या जाणिवेतून मुलांचं उज्वल भवितव्य घडत असतं. आपल्या लेकरांचं कोडकौतुक पाहिल्यावर बापाचं काळीज आपसूकच मोठं होत असतं. आपली कर्तृत्ववान मुलं पाहून बापाला आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटतं. मुलांचं सुख, समाधान ह्यातच बापाला सारं काही पावल्यासारखं वाटतं.
  "बापाकडं कधीच कुणी करू नका दुर्लक्ष..
   लेकरांवरती सदैव त्याचं घारीसारखं लक्ष.."
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
लेखक:- दिभा उर्फ दिगंबर 

No comments:

Post a Comment

महिनाभर साखर नाही खाल्ल्यामुळे शरीरात होती ‘हे’ बदल….

महिनाभर साखर नाही खाल्ल्यामुळे शरीरात होती ‘हे’ बदल…. साखर सोडणे जितके कठीण आहे तितके त्याचे परिणाम अधिक धक्कादायक आहेत. केवळ एक...